रंगपंचमीच्या उत्साहात दुर्दैवी घटना: दोन मुलांचा दुःखद अंत
सडक अर्जुनी- रंगपंचमी (धुळवड) सणानिमित्त रंग खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास गावातील तलावात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सडक अर्जुनी तालुक्यातील फूटाळा येथे मंगळवारी ३ मार्च रोजी घडली. सागर गहाणे (१६) व प्रणय गहाणे (१३) अशी मृतांची नावे आहे. धुलिवंदन सारख्या सणाला गावात अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सर्वत्र धुळवड सण साजरा करत असताना फुटाळा येथेही आनंदाचे वातावरण होते. त्यातच सकाळच्या सुमारास गावातील पुरुष, महिला, मुले यांनी विविध रंगाची उधळण करून धुलिवंदनाचा आनंद घेतला. दरम्यान, रंग खेळल्यानंतर दुपारी काही मुलांनी गावातील तलावात आंघोळ करण्याचे ठरवले. यात त्यांच्यासह मृतसागर व प्रणव हे दोघेही तलावात आंघोळ करण्यासाठी गेले. आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तलावातील पाण्यामध्ये बुडून दोघांचाही मृत्यू झाला. यावेळी इतर मुलांनी आरडा-ओरड करत गावात ही माहिती दिली.
गावकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे फुटाळा गावात सर्वत्र शोककळा पसरली असून ऐन धुलिवंदनाच्या दिवशी ही घटना घडल्याने जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मात्र ह्या घटनेमुळे आरोग्य विभागावर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. पाहिजे त्या सुविधा सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसल्याने नागरिक चांगलेच संतापले होते.
