गुगल कम्प्युटर एज्युकेशनमध्ये MKCL चा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस उत्साहात संपन्न
•गुगल कम्प्युटर एज्युकेशनमध्ये MKCL चा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस उत्साहात संपन्न
•डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा संकल्प
• तंत्र ज्ञान सोबत स्वतःला सुद्धा अपडेड करणे आवश्यक असते.
सडक अर्जुनी : स्थानिक नामांकित संस्था गुगल कम्प्युटर एज्युकेशन, सडक अर्जुनी येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) चा २५ वा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस आज, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्सवी वातावरण प्राप्त झाले.

कार्यक्रमाची सुरुवात एस. चंद्रा कॉलेज, सडक अर्जुनी येथील प्राध्यापक प्रा. रामटेके सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुशील लाडे सर होते. प्रमुख पाहुण्या म्हणून यशवंत कॉन्व्हेंटच्या सौ. प्रमिला कोरे मॅडम उपस्थित होत्या. तसेच मंचावर गुगल कम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका सौ. धनश्री ब्राम्हणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संगणक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित
उद्घाटनपर मनोगतात प्रा. रामटेके सर यांनी आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात संगणक व तंत्रज्ञानाचे ज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक झाले असल्याचे सांगितले. शिक्षण, रोजगार, व्यवसाय तसेच दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये डिजिटल कौशल्यांना वाढते महत्त्व प्राप्त झाले आहे. MKCL ने गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत संगणक शिक्षण पोहोचवून डिजिटल शिक्षणाची मोठी चळवळ उभी केली, असे त्यांनी नमूद केले. 
प्रमुख पाहुण्या सौ. प्रमिला कोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य, सुरक्षित आणि सकारात्मक वापर करण्याचे आवाहन केले. केवळ मोबाईल व इंटरनेटचा वापर मनोरंजनासाठी न करता त्याचा उपयोग ज्ञान, शिक्षण, कौशल्यविकास आणि करिअर घडविण्यासाठी करावा, असे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, असा संदेश त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांनी डिजिटल कौशल्य आत्मसात करावे
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुशील लाडे सर यांनी गुगल कम्प्युटर एज्युकेशनच्या माध्यमातून सडक अर्जुनी परिसरातील विद्यार्थ्यांना संगणक व डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या कार्याचे कौतुक केले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी संगणक, इंटरनेट, डिजिटल सेवा आणि तंत्र ज्ञाऩा सोबत स्वतःला सुद्धा अपडेड करणे आवयःक असते . आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. 
MKCL च्या २५ वर्षांच्या प्रवासाचा गौरव करताना त्यांनी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेच्या संचालिकेकडून वाटचालीचा आढावा
सौ. धनश्री ब्राम्हणकर यांनी गुगल कम्प्युटर एज्युकेशनच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासोबतच डिजिटल युगातील आवश्यक कौशल्ये देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. MKCL च्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांनी अभिनंदन व्यक्त केले आणि भविष्यातही विद्यार्थ्यांना दर्जेदार संगणक शिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला.
शिक्षकवृंदाचे विशेष योगदान
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील शिक्षकवृंद श्री. सचिन सर, सौ. राखी कापगते मॅडम, शुभम सर, प्रणय सर, नानू सर, बिंदू मॅडम आणि साक्षी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गुगल कम्प्युटर एज्युकेशनमधील विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे करण्यात आले. उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक व नागरिकांचे आभार मानल्यानंतर MKCL च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिन सोहळ्याची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
