कंटेनरची हवा काढून रेल्वे फाटक पार करण्याचा गोरखधंदा!?; रेल्वे विभागाला लाखोंचा फटका? जबाबदार कोण?
सुशील लाडे.. ( संपादकीय)
सडक अर्जुनी १०/०९/२६ : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 आणि गोंदिया–चांदाफोर्ट रेल्वेमार्ग एकाच परिसरातून जात असल्याने सौंदड येथे वाहतुकीची मोठी वर्दळ असते. मात्र, याच परिसरात रात्री ला मोठ्या आकाराच्या कंटेनरची हवा काढून रेल्वे फाटक पार करण्याचा कथित गोरखधंदा कित्येक वर्षांपासून सुरू असल्याची गंभीर चर्चा परिसरात आहे. या प्रकारामुळे रेल्वे विभागाच्या महसुलाला लाखोंचा फटका बसत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सूत्रानुसार प्राप्त माहितीनुसार, विशेषतः रात्रीच्या वेळी सौंदड व फुटाळा परिसरात मोठ्या आकाराच्या कंटेनरची भलीमोठी रांग लागलेली दिसून येते. काही कंटेनरची उंची रेल्वे फाटकावरील विद्युत वाहिन्या अथवा इतर संरचनेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत काही मोठ्या कंटेनरची हवा कमी करून त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर हे कंटेनर रेल्वे फाटक पार करीत असल्याची चर्चा आहे.
या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी अनेकदा वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्याने इतर वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा प्रकारातून एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नियमित परवानगीची प्रक्रिया बाजूला ठेवून शॉर्टकट?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्धारित उंचीपेक्षा अधिक आकाराच्या मालवाहू कंटेनरना रेल्वे फाटक अथवा संबंधित रेल्वे मार्गावरील संरचना पार करण्यासाठी नियमानुसार संबंधित रेल्वे विभागाची विशेष परवानगी घ्यावी लागू शकते. आवश्यकतेनुसार तांत्रिक उपाययोजना करून अधिकृत प्रक्रियेनंतर अशा वाहनांना मार्ग उपलब्ध करून दिला जातो. या प्रक्रियेसाठी नियमानुसार शुल्क आकारले जाते.

जर या प्रकरणातील आरोप व चर्चा सत्य असतील, तर हा प्रकार केवळ नियमांचे उल्लंघन नसून सार्वजनिक सुरक्षेशी खेळ करणारा गंभीर विषय ठरू शकतो. तसेच नियमानुसार मिळणाऱ्या शुल्कापासून रेल्वे विभागाचा महसूलही प्रभावित होत असल्याची शक्यता आहे.
शासकीय यंत्रणा गप्प का? नागरिकांना प्रश्न?
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, हा प्रकार कथितरीत्या इतक्या वर्षांपासून सुरू असताना संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास तो कसा आला नाही? राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या कंटेनरच्या रांगा लागत असतील, वाहतुकीची कोंडी होत असेल आणि संशयास्पद पद्धतीने कंटेनर रेल्वे फाटक पार करीत असतील, तर संबंधित विभागांनी याची चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रेल्वे प्रशासन, वाहतूक विभाग, स्थानिक पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
अपघात झाल्यानंतरच कारवाई होणार का?
रेल्वे फाटक परिसर हा अत्यंत संवेदनशील भाग मानला जातो. मोठ्या आकाराच्या वाहनांमुळे विद्युत यंत्रणा, रेल्वेची संरचना आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आताच या प्रकाराची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.
सौंदड–फुटाळा परिसरात रात्रीच्या वेळी नेमके काय घडते? मोठ्या कंटेनरची हवा काढून रेल्वे फाटक पार करण्यामागे कोण आहेत? या कथित प्रकारातून कोणाचा फायदा होत आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्वांना कुणाचा आशीर्वाद आहे?
या प्रश्नांची उत्तरे आता संबंधित प्रशासनाने द्यावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
आता चौकशीची गरज!
हा कथित प्रकार तातडीने थांबवून संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
